माध्यमकर्मींनी उपेक्षित महिलांचा आवाज बनावे : विजया रहाटकर   

पुणे : महिलांना सक्षम केल्याशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. त्यामुळे माध्यमक्षेत्रात कार्य करणार्‍या महिलांनी विशेष करून महिला सक्षमीकरणामध्ये योगदान द्यावे. त्यांनी ग्रामीण आणि उपेक्षित महिलांचा आवाज बनावे, असे मत महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले. 
 
आयएमडीआरच्या वीर सावरकर सभागृहात आयोजित व्हीएसके पुणे फाउंडेशन संचलित विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित ’महिला माध्यमकर्मी संमेलन २०२५’च्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महिला माध्यमकर्मींनी आपल्या वार्तांकनातून बदल घडविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन रहाटकर यांनी केले. त्या म्हणाल्या, सक्षम असतानाही सादरीकरणाअभावी महिलांना नेतृत्त्वाची संधी मिळत नाही. महिलांनी आता स्वतः ब्रँड बनत सर्वच क्षेत्रात नेतृत्त्व करावे. 
 
उद्घाटन सत्रात ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी माध्यम, विचारसरणी आणि त्याचे काळानुरूप गणित समजावून सांगितले. ते म्हणाले, माध्यम क्षेत्रात स्वतःची शैली विकसित करत स्वतःचे प्रेक्षक तयार करायला हवेत. यावेळी केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार प्रतिभा चंद्रन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक डॉ. रवींद्र वंजारवाडकर, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह महेश करपे, प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री आदी उपस्थित होते. 
 
संमेलनात दुपारी ’माध्यमातील मी’ या परिसंवादात टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील मॉडर्न सायन्सेस अ‍ॅण्ड प्रोफेशनल स्किल्सच्या अधिष्ठाता डॉ. उज्ज्वला बर्वे, ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर, सरिता कौशिक, आर. जे. शोनाली यांनी आपले अनुभव मांडले. संवाद सत्राचे समन्वय ज्येष्ठ पत्रकार अश्विनी मयेकर यांनी केले. कृत्रिम प्रज्ञेच्या माध्यम क्षेत्रातील वापरावर प्रा. प्रांजली देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अंजली तागडे व्यासपीठावर होत्या. पश्चिम महाराष्ट्रातील १०० हून अधिक महिला माध्यमकर्मी या संमेलनास उपस्थित होत्या.
 
हा कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात झाला. ही वास्तू आणि लोकमान्य टिळक यांचे नाते लक्षात घेऊन डॉ. निरगुडकर यांनी १९१८ मध्ये लोकमान्य टिळक यांची लंडनच्या मजूर पक्षनेत्यांशी झालेली भेट, तसेच भारतातून त्यांना पाठवलेल्या २००० पौंड निधीचा आवर्जून उल्लेख केला.

Related Articles